Maharashtra

पारनेरमध्ये शेतकरी कुटुंबातील चौघांची आत्महत्या

By PCB Author

August 26, 2019

पारनेर, दि. २६ (पीसीबी) – एका शेतकरी कुटुंबातील चौघा जणांनी राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गुणोरे येथून उघडकीस आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बाबाजी विठ्ठल बढे (वय ३७) पत्नी कविता बढे, मुलगा आदित्य (वय १५), व धनंजय (वय १२) हे चारही जण घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आज सकाळी आढळून आले. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिक आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. शेतकरी बाबाजी बढे यांनी पत्नी आणि मुलांचा खून करून स्वतः आत्महया केल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी तपास सुरू आहे.