Maharashtra

पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका; शरद पवारांचा पक्षांतर करणाऱ्यांना टोला

By PCB Author

September 18, 2019

उस्मानाबाद, दि. १८ (पीसीबी) –  पक्ष सोडून गेले ते इतिहास जमा होतील. नाही तरी आता महिन्याभरावर निवडणूक आलीच आहे.  गेलेल्यांची चर्चा थांबवून आता येणाऱ्यांची  चर्चा करा, असे सांगून  त्यातही ज्यांना जायचंय तर जा…. पण पाया पडण्याइतका स्वाभिमान गहाण ठेऊ नका, असे शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले पद्ममसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांचे नांव न घेता टोला लगावला.

शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत.  यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांच्या उपस्थित रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शन केले.

पवार म्हणाले की, मी ५ वर्षाच्या कामांचा हिशेब द्यायला निघालो आहे, असे विधान करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. हिशेब देणे ही चांगली गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात आमच्या घरात खतावणी लिहिणारे असायचे, अशी  खोचक टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापुरात भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यामुळे उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले आहे.  पक्षाला उभारी देण्यासाठी पवारांनी उस्मानाबादमध्ये मेळावा घेऊन कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला.