पाणी पुरवठ्याबाबत शहरासाठी २०५० पर्यंतचे नियोजन : आमदार महेश लांडगे..

0
368

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठ्याबाबत केवळ पवना धरणावर अवलंबून रहावे लागत होते. मात्र, भाजपाच्या काळात पुढील ५० वर्षांत शहराची वाढणारी लोकसंख्या आणि पाणीपुरवठ्याचे स्त्रोत सक्षम करण्यासाठी भाजपा सत्ताकाळात नियोजन करण्यात आले. त्यामुळे भामा- आसखेड आणि आंद्रा प्रकल्पातून २६३ एमएलडी पाणी मिळवण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. चिखली येथे त्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले.

 

चिखली भागात नव्याने विकासित झालेल्या सोसायटींमध्ये पाण्याची मोठी समस्या भेडसावत आहे. याविषयी एैश्वर्यम हमारा या सोसायटी मधील नागरिक आमदार महेश लांडगे आणि माजी महापौर तथा नगरसेवक राहुलदादा जाधव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. दरम्यान, राहुल जाधव यांनी स्वखर्चातून सोसायटीला विहीर खोदून दिली. त्यामुळे एैश्वर्यम हमारा सोसायटीसह परिसरातील सुमारे २५ सोसायट्यांचा पाणीप्रश्न निकालात निघाला आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्याहस्ते एैश्वर्यम हमारा सोसायटीतील विहीरीचे जलपूजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सारीका बोऱ्हाडे, मोशी चिखली हाऊसिंग फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे , निलेश बोराटे, नितीन बोराटे, निखिल बोऱ्हाडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष सोनाम जांभुळकर, युवा मोर्चा चिटणीस मुक्ता गोसावी, गुरुदत्त पतसंस्थेच्या अध्यक्षा मंगला जाधव आदी उपस्थित होते.
आमदार लांडगे म्हणाले की, महापालिकेच्या मदतीवर अवलंबून न रहाता काम करण्याची भूमिका ज्या लोकप्रतिनिधींनी ठेवली. त्या यादीमध्ये माजी महापौर राहुल जाधव यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पाण्याचा टँकर, रुग्णवाहिका, शववाहिका आणि मलनिस्सारण गाडीसुद्धा जाधव यांनी स्वखर्चातून परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिली. आता स्वखर्चाने विहीर बांधून पाण्याची पाईपलाईन टाकून जोडून दिली आहे. या नवीन व्यवस्थेतून पाणी समस्या कमी होईल. महापालिका आणि प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा न करता पाणी स्त्रोत निर्माण केला.तसेच, सदर पाणी पिण्योग्य असल्याचा दाखलाही प्रशासनाकडून सोसायटीधारकांसाठी सादर केला. याबाबत राहुल जाधव यांच्या कार्याचे कौतुकही आमदार लांडगे यांनी केले.