Pune

पाचवीच्या पुस्तकात शहिद सुखदेव यांचे नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा – ब्राम्हण महासंघाची मागणी

By PCB Author

July 18, 2020

पुणे, दि. १८ (पीसीबी) : इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात राज्य शिक्षण प्रसारक मंडळाने चूक केल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केला आहे. आठवीच्या मराठीच्या पुस्तकात इतिहासकार यदुनाथ थत्ते यांचा लेख छापण्यात आला आहे. यामध्ये भगतसिंग, राजगुरु आणि कुर्बान हुसेन हे इंग्रजाशी लढताना फासावर गेले असा उल्लेख आहे. यावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने याला आक्षेप घेतला आहे. सुखदेव यांचं नाव वगळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केली आहे.

आठवीच्या अभ्यासक्रमात प्रख्यात लेखक यदुनाथ थत्ते यांचा ‘भारत माझा देश आहे’ या धडा आहे. या धड्यात चूक झाल्याचं समोर आलं आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु हे तीन क्रांतिकारक फासावर गेल्याचं सगळ्यांनाच माहित आहे. परंतु या धड्यात सुखदेव यांच्याऐवीज कुरबान हुसेन यांचा उल्लेख केला आहे. “देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र, दोघांवर प्रेम हवे, होय ना?” “बरोबर आहे” मुले म्हणाली. एक मुलगा म्हणाला, “भगतसिंह, राजगुरु, कुरबान हुसेन हे फासावर गेले. ते देशावर खरेखुरे प्रेम करत होते” मी विचारले “ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा? आपले देशावर प्रेम असते ते फक्त आपत्काळी… यावर ब्राह्मण महासंघाने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मराठीच्या पुस्तकातील ही चूक निंदनीय असून हे पुस्तक मागे घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असं आनंद दवे म्हणाले. कुर्बान हुसेन हे सोलापूरच्या चार हुतात्म्यांपैकी एक आहेत. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने 9 ते 11 मे 1930 या काळात तीन दिवसांचं स्वातंत्र्य अनुभवलं. या घटनेमुळे स्वातंत्र्य संग्रामादरम्यान ब्रिटिशांनी मलप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन आणि किसन सारडा यांना 12 जानेवारी, 1931 रोजी सोलापूरमध्ये फाशी दिली. हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचा जन्म फ्रेम मेकरचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात झाला. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी ही त्यांची स्फूर्तिदैवतं होती. स्वातंत्र्य, स्वदेशी, समता, समाजवाद आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍य या पंचसूत्रीवर त्यांची निष्ठा होती. डॉ. कृ. भि. अंत्रोळीकरांच्या नेतृत्वाखाली सभा-संमेलन, मोर्चा, मिरवणुकांत ते सहभागी होत असल्याने आणि हिंदू-मुस्लिम ऐक्‍याची तळमळ त्यांच्या लेखणीत आणि वाणीत दिसून येत होती. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या यात्रेच्या सुरुवातीच्या दिवशी 12 जानेवारी 1931 रोजी हसत हसत फासावर जाणाऱ्या चार हुतात्म्यांनी सोलापूर नगरीचे नाव स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात कोरलं आहे.