Maharashtra

“पाकिस्तानातून मोदींचा जयघोष करणाऱ्यास नागरिकत्व व पद्मश्री मिळेल”

By PCB Author

January 27, 2020

मुंबई,दि.२७(पीसीबी) – “हे स्पष्टच आहे की, जर कोणी पाकिस्तानातून ‘जय मोदी’चा नारा देत असले, तर त्याला या देशाच्या नागरिकत्वाबरोबच पद्मश्री पुरस्कार मिळेल. हा देशातील जनेचा अपमान आहे” असं राष्ट्रावादी काँग्रेसेचे प्रवक्ते व राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

गायक-संगीतकार अदनान सामी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मनसे, काँग्रेस पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही याबाबत विरोध दर्शवण्यात येत आहे. सामी यांना जाहीर झालेल्या या पुरस्कारावरून नवाब मलिक यांनी केंद्र सरकावर टीका केली आहे.

‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार २५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. यात गायक-संगीतकार अदनान सामी यांच्याही नावाचा समावेश आहे.

काँग्रेसचे प्रवक्ता जयवीर शेरगील यांनी देखील या मुद्यावरूवन केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “कारगील युद्धामध्ये आपलं सर्वस्व झोकून देणारे व माजी लष्कर अधिकारी मोहम्मद सनाउल्लाह यांना विदेशी म्हणून घोषित केलं. तर दुसरीकडं भारताविरुद्ध लढणाऱ्या एका पाकिस्तानी हवाई दलातील वैमानिकाच्या मुलाला देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्यामुळे हे घडलं आहे”, असं शेरगील यांनी म्हटलं आहे.