नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – पाकिस्तानला मोदींपेक्षा चांगला पंतप्रधान मिळू शकत नाही. मोदींनी आयएसआयला वायुसेनेच्या पठाणकोट येथील कॅम्पवर हल्ला करु दिला, नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचा अजेंडा लागू करत आहेत, अशी सडकून टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
मोदींचे समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विधानाचा आधार घेत केजरीवाल यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. केजरीवाल म्हणाले की, पुलवामा सारख्या घटना निवडणूकीपूर्वी घडवल्या गेल्या आहेत. तसेच मोदी आणि इम्रान खान यांच्यात काय शिजतंय? असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.
केजरीवाल पुढे म्हणाले की, चार आठवड्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आता इम्रान खान मोदींना पंतप्रधान होताना पाहू इच्छितात. ते असे का करत आहेत? आता लोकांनी पुलवामा हल्ल्यासंदर्भात प्रश्न विचारणे सुरु केले आहे. इम्रान खान यांनी लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने अगोदर पुलवामा हल्ला का घडवून आणला? असे अनेक सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केले आहेत.