इस्लामाबाद, दि. २७ (पीसीबी) – भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तातडीने अणुविषयक समितीची बैठक बोलावली आहे.
भारताच्या एअर स्ट्राइकनंतर मंगळवारी पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाली होती. त्यात अणुविषयक समितीशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार इम्रान खान यांनी ही बैठक बोलावली असून काही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकपुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा हात असल्याचे समोर आले होते. त्यानंतर भारताने पाकमधील बालाकोट येथील ‘जैश’च्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाले. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.