Maharashtra

पवारांनी मतांचे राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांचा टीका

By PCB Author

September 16, 2019

कराड, दि. १५ (पीसीबी) – पाकिस्तान संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतेही वक्तव्य करताना विचार केला पाहिजे. त्यांच्या वक्तव्याने भारताला फायदा होईल की पाकिस्तानला याचा विचार करायला हवा. मतांसाठी राजकारण करू नये, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

काँग्रेसचे दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजीत देशमुख यांनी कराड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. तसेच उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाचंही समर्थन केलं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी कोणतंही वक्तव्य करताना विचार करायला हवा. पाकिस्तानचं कौतुक केल्याने मुसलमान खूष होतील आणि मतदान करतील या भ्रमात त्यांनी राहू नये. भारतातील मुसलमान देशाभिमानी आहेत. पवारांच्या या वक्तव्यातून राष्ट्रवादीची मानसिकता कळते, असे सांगतानाच निवडणुका येतील आणि जातील. पण मतं घेण्यासाठी अशी वक्तव्ये करू नयेत, असा टोला फडणवीस यांनी पवारांना लगावला.