पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाकडे आमदार जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले; हिवाळी अधिवेशनात विचारला तारांकित प्रश्न

0
398

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवडमधील पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या नद्यांमध्ये कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट सोडले जात आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्या आठवड्यात संपलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषित करणाऱ्या भागाचे प्रारूप कृती अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांच्या उत्तरात नमूद आहे.