परीक्षेला बसलेल्या ३२ विद्यार्थ्यांना कोरोना

0
406

बेंगळूरू , दि. ९ (पीसीबी) – कोरोना संसर्ग सुरू असल्याने परिक्षा घेऊ नका असे वारंवार लोक सांगत असताना भाजपचे राज्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्याचे परिणाम आचता दिसू लागले आहेत. कोरोना संकटाच्या सावटाखाली कर्नाटकमध्ये दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेतल्यानंतरही एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. सरकारने शनिवारी याबद्दलची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ८० विद्यार्थ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

कोरोनामुळे शालेय अभ्यासक्रमांपासून ते व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत सर्वच परीक्षांचं वेळापत्रक कोलमडून पडलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार, दररोज वाढणारी रुग्णसंख्या यामुळे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयासह अनेक राज्यांकडून महत्त्वाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात येत आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची भीती असल्यानं अनेक राज्यांनी हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारने मार्च एप्रिलमध्ये होणारी दहावीची परीक्षा पुढे ढकलून २५ जून ते ३ जुलै या कालावधीत घेण्याचे निश्चित केले होते. ही परीक्षा पूर्ण झाली असून, एका परीक्षा केंद्रावरील ३२ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या ८० विद्यार्थ्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ३ हजार ९११ विद्यार्थ्यांना कंटेनमेंट झोनमध्ये राहत असल्यानं परीक्षा देता आली नाही. त्याचबरोबर ८६३ विद्यार्थी प्रकृती बरी नसल्याने गैरहजर होते.

कोरोनाच्या भीतीपोटी महाराष्ट्रातील परीक्षा अधांतरी
कोरोनाच्या काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका उद्भवण्याची भीती असून, महाराष्ट्र सरकारनं विद्यापीठ परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युजीसीनं नव्याने परीक्षा घेण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे राज्यातील परीक्षा होणार की नाही? हा निर्णय सध्यातरी अंधातरीच आहे. राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परिक्षा घेण्यास स्पष्ट विरोध दर्शविला आहे. परिक्षा घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोशारी आग्रही आहेत, तर आघाडी सरकारचा त्याला विरोध आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका, असे नागरिकांचे मत आहे.