परमबीरसिंह यांची चौकशी सुरू असतानाच त्यांच्यावर निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू

0
281

मुंबई, दि.३० (पीसीबी) : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींचे वसुलीचे आरोप केले. यामुळे राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर परमबीर सिंह गायब होते. परमबीर यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यावरुन त्यांना अनेक वेळा समन्स बजावून देखील ते गैरहजर राहिले. सध्या त्यांची मुंबईत चौकशी सुरू असतानाच आता त्यांच्यावर निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू केल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

परमबीर सिंह यांच्यावर त्यांच्या गैरवर्तवणूक आणि इतर अनियमिततेबाबत कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, त्याचबरोबर त्यांच्या निलंबनाची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आलीय, अशी माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे. ‘परमबीर सिंह परतल्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे त्यांनी सरकारी वाहनांचा वापर करू नये. दरम्यान, परमबीर सिंह यांच्यात आणि सचिन वाझे यांच्यामध्ये सोमवारी झालेल्या भेटीची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं देखील गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे हे मनसुख हिरेन हत्येशी संबंधित असल्याने त्याची देखील चांदीवाल आयोगाकडून चौकशी सुरू आहे. सुरुवातीला दोघांत काही सेकंद बोलणं झाल्याचं सांगण्यात आलं. परंतु, दोघेही तासभर सोबत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी संबंधित प्रकरणावर नाराजी व्यक्त करत, सचिन वाझे-परमबीर भेटीबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत.