नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा भारतात परत आणणार, असे आश्वासने दिले होते. त्यानंतर ते सत्तेवर येऊन साडेचार वर्षे पूर्ण झाले, तरीही त्यांना परदेशातून एक काळा पैसा भारतात आणता आलेला नाही. यासंदर्भात भारतीय वन सेवेतील अधिकारी संजीव चतुर्वेदी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागविली होती. मात्र, माहिती देण्यास कार्यालयाने नकार दिला आहे.
परदेशातून किती काळा पैसा भारतात आला, याबाबत चतुर्वेदी यांनी माहिती मागविली होती. यावर काळ्या पैशांसंदर्भात तपास करण्यासाठी एसआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती दिल्यास हा तपासाच्या प्रक्रियेला बाधा पोहचू शकते, असे पीएमओने आपल्या उत्तरात म्हटले आहे.
दरम्यान, संजीव चतुर्वेदी यांनी जून २०१४ पासून किती काळा पैसा भारतात आला? अशी माहिती मागितली होती. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या प्रश्नाला उत्तर देताना हा प्रश्न पारदर्शिता कायद्यातील कलम२ च्या कक्षेत येत नाही, असे कारण पीएमओने दिले होते . त्यामुळे चतुर्वेदी यांनी केंद्रीय माहिती आयोगाकडे धाव घेतली होती. मागील महिन्यात यावर सुनावणी करताना माहिती आयोगाने १५ दिवसात उत्तर देण्याचे आदेश पीएमओला दिले होते.