पतीचे लग्नानंतरही अनैतिक संबंध; जाब विचारणा-या विवाहितेचा सासरच्या लोकांकडून छळ

0
238

चिखली,दि.२३ : पतीने विवाहानंतर देखील एका तरुणीसोबत अनैतिक संबंध ठेवले. याबाबत विवाहितेने जाब विचारला असता सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. तसेच माहेरहून दागिने आणि पैसे आणण्याची मागणी केली.

याबाबत पिडीत विवाहितेने गुरुवारी (दि. 22) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती अतुल अरुण नाईक (वय 32), सासू शकुंतला अरुण नाईक (वय 55), सासरे अरुण बाळकृष्ण नाईक (वय 59), दीर अनिल अरुण नाईक (वय 28), वैशाली अनिल नाईक (वय 28), कांचन शरद नाईक (वय 25), शरद अशोक नाईक (वय 30, सर्व रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे), मानसी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 21 जून 2019 पासून 6 सप्टेंबर 2019 या कालावधीत जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे येथे घडला. विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी लग्नात सासरच्या लोकांना हवा तसा मानपान केला नाही. सासरची मंडळी आणि त्यांच्या नातेवाईकांकडे लक्ष दिले नाही. उठबस केली नाही. या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ केली. पती अतुल याचे मानसी नावाच्या मुलीसोबत लग्नानंतरही प्रेमसंबंध होते. याबाबत माहिती झाल्यानंतर विवाहितेने सासरच्या मंडळींकडे विचारणा केली. त्यावर ‘लग्नामध्ये मुलाच्या अंगावर सोन्याची चेन आणि अंगठी दिली नाही. ते आन नंतर रुबाबात बोल’ असे म्हणून विवाहितेला त्रास दिला.

जाऊ वैशाली हिने ‘तुझ्या आई वडिलांकडून पैसे आणून तुझ्या पतीला दे’ असे म्हटले. तर नणंद कांचन आणि तिच्या पतीने विवाहितेच्या संसारात ढवळाढवळ केली. पती अतुल याने मानसीच्या सांगण्यावरून विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देऊन घरातून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहे.