‘….पण गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ’; फडणवीसांचा राज्य सरकारला इशारा

0
237

पणजी, दि.२२ (पीसीबी) : सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी वॉर्डरचना केली किंवा प्रभागरचना केली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य सरकारकडून वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्याला हवे तसे वॉर्डची तोडफोड करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलं आहे, पण गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

शिवाय राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा यातून दिसतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांचं पत्र प्रेसमध्ये दिलेलं नाही. राज्यपालांचं पत्र म्हणजे आदेश नसतो, ते कारवाई करावी असं सांगत असतात, ही आताची परिस्थिती नाही, ही परंपरागत चालत आलेली परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यात पुढच्या वर्षी मुंबईसह 15 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, तसेच नगरपंचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी यावर आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. 15 पैकी मुंबई महापालिकेत सध्याची एक प्रभाग पद्धत कायम राहणार आहे. उरलेल्या महापालिकेत दोन की चार प्रभाग पद्धती असावी यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर यासह काही महापालिकेत दोन सदस्य प्रभाग पद्धत रहावी अशी काही नेत्यांची भूमिका आहे. नगरपंचायतीत एक सदस्य प्रभाग पद्धत, तर नगरपालिकांमध्ये दोन सदस्य प्रभाग पद्धत असण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 97
भाजप – 83
काँग्रेस – 29
राष्ट्रवादी – 8
समाजवादी पक्ष – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
अभासे – 1
एकूण – 227
बहुमत – 114

आगामी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी अजित पवार यांनी आज महत्वाचं वक्तव्य केलं आहे. आम्ही काही साधू संत नाही, आम्ही राजकारणी माणसं आहोत आणि काम करायचं म्हटलं तर कॉर्पोरेशन ताब्यामध्ये असल्यास त्या संदर्भात समन्वय साधता येतो, असं सूचक वक्तव्य करत अजितदादांनी एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसुबे स्पष्ट केले आहेत.