Maharashtra

पक्षांतर्गत राजकारणामुळे काँग्रेस खासदार राजीव सातव लोकसभा लढवणार नाहीत

By PCB Author

November 17, 2018

मुंबई, दि.१७ (पीसीबी) – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे    हिंगोलीचे खासदार राजीव सातव लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची माहिती सूत्रांकडून समजते. हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून सातव यांनी स्वतःहून निवडणुकीतून  माघार घेतली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजीव सातव यांच्यावर पक्षाने गुजरात राज्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सातव यांचा हिरमोड झाल्याचे सांगितले जात होते. मात्र हिंगोली मतदारसंघातील पक्षांतर्गत राजकारणामुळे सातव स्वतःहून माघार घेत असल्याचे बोलले जात आहे. खासदार असूनही मतदारसंघातील नांदेड जिल्ह्यात काम करण्याची योग्य संधी मिळाली नाही, अडवणूक झाली, त्यामुळे सातव यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात उमरखेड, कळमनुरी, किनवट, बसमत, हदगाव, हिंगोली या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यातील हदगाव आणि किनवट नांदेड जिल्ह्यात येतात. या दोन मतदारसंघात राजीव सातव यांना पक्षातून काम करण्यास अडवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे.