नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. मोदी ‘नीच’ असल्याचा उल्लेख अय्यर यांनी केला होता. मणिशंकर अय्यर यांनी ‘रायझिंग काश्मिर’ या वृत्तपत्रात याबाबत लेख लिहिला आहे.
२०१७ मधील गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ असे म्हटले होते. अय्यर यांच्या वक्तव्याचा फटका काँग्रेसला निवडणुकीतही बसला होता. त्यानंतर काँग्रेसने अय्यर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. मात्र आजही आपण त्या वक्तव्यावर ठाम असल्याचे अय्यर यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानी रडारपासून वाचण्यासाठी ढगांचा आसरा घेण्याचा भारतीय वायुसेनेला सल्ला दिला होता, हे मोदींनी केलेले वक्तव्य आश्चर्यकारकरित्या मूर्खपणाचे होते, असेही अय्यर यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे अवैज्ञानिक दावे करताना मोदी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का? आणि निर्ढावलेल्या पंतप्रधानांची चूकही सुधारता न येण्याइतके हे अधिकारी भित्रे आहेत का?’ असा सवाल अय्यर यांनी उपस्थित केला आहे.