नवी दिल्ली, दि. १४ (पीसीबी) – जेएनयू घोषणाबाजी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अखेर तीन वर्षांनंतर कन्हैय्या कुमारसह १० जणांविरोधात आज (सोमवार) आरोपपत्र दाखल केले आहे. यावर प्रतिक्रिया देताना ‘मला काही माहिती नाही, पण जर हे खरे असेल, तर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्ली पोलिसांचे आभार मानतो’ असे खोचक विधान कन्हैय्या कुमार यांने केले आहे.
कन्हैय्या कुमार म्हणाला की, तीन वर्षांनंतर नेमके निवडणुकांच्या आधी आरोपपत्र दाखल करण्यामागे राजकीय डाव आहे, हे स्पष्ट होत आहे. मात्र, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ‘मोदीजी आम्ही तुमच्याकडे १५ लाख रुपये, रोजगार आणि अच्छे दिन मागितले होते. देशासाठी अच्छे दिन कधी येतील माहित नाही पण निवडणुकांपूर्वी आमच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे, असे त्यांने म्हटले आहे.
याप्रकरणी बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाला की, याबाबत मला काहीही माहिती नाही. परंतु जर हे खरे असेल तर दिल्ली पोलिसांनी न्यायालयात पुरावे सादर करायला हवे, आणि या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हायला हवी. दिल्ली पोलिसांकडे पुरावे नाहीत, असा दावाही कन्हैय्याने यावेळी केला आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून न्यायालयात सरकारने आखलेल्या कटाचा पर्दाफाश होईल, असेही कन्हैय्या म्हणाला.