नवी दिल्ली, दि. २० (पीसीबी) – भारत आणि पाकिस्तान या शेजारी राष्ट्रांमध्ये चर्चा होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शहा महमूद कुरेशी यांनी आज (सोमवारी) केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना कुरेशी म्हणाले की, भारत- पाकिस्तान संबंधावर दोन्ही देशांमध्ये सातत्याने चर्चा होणे गरजेचे आहे. शेवटी आपण शेजारी राष्ट्र आहोत. दोघांमध्ये प्रलंबित वाद असून चर्चेशिवाय पर्याय नाही. तसेच अतिधाडस दाखवूनही उपयोग नाही. दोन्ही देशातील वाद गुंतागुंतीचे आहेत. त्यामुळे ते सोडवताना असंख्य अडथळे येत आहेत. त्यासाठी संवादाच्या प्रक्रियेला सुरुवात केली पाहिजे, असे ते म्हणाले.
काश्मीरमधील वस्तूस्थिती स्वीकारुन भारत – पाकिस्तानने पुढे गेले पाहिजे, असे सांगून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेची तयारी दर्शवली आहे, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नव्हता, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता परराष्ट्र मंत्रालय पाकच्या या दाव्यावर कोणती प्रतिक्रिया देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.