पंतप्रधान निवडणुकीनंतर ठरवू; डाव्यांचा राहुल गांधींना विरोध?

0
680

नवी दिल्ली, दि. १७ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधी महाआघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार आत्ताच ठरवता येणार नाही. याबाबतचा निर्णय निवडणुका झाल्यानंतर घेतला जाऊ शकतो,  असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी आज (सोमवार ) व्यक्त केले आहे.

चेन्नईतील एका कार्यक्रमात द्रमुकचे अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी योग्य असल्याचे म्हटले होते.  राहुल यांच्यात नरेंद्र मोदींसारख्या फॅसिस्ट नेत्याला हरवण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी म्हटले होते.  यावर येचुरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रत्येकाचे वैयक्तिक मत वेगळे-वेगळे असू शकते. मात्र, आपण देशाच्या इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे. भाजपविरोधी कोणताही पर्याय समोर यायचाच असेल, तर तो लोकसभा निवडणुकीनंतर येऊ शकतो, असे येचुरी  म्हणाले.  दरम्यान, डावे पक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व स्वीकारणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.