Desh

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या महत्त्वाच्या घोषणा केल्या जाणून घेवूयात

By PCB Author

March 24, 2020

दिल्ली, २४ (पीसीबी) – करोनाशी सुरु असलेल्या लढ्यात केंद्र सरकारने सर्वात मोठी घोषणा केली असून संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेशी संवाद साधला. अर्ध्या तासाच्या आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

१) आज मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात लॉकडाउन.

२) पुढील २१ दिवस हा लॉकडाउन असेल. यादरम्यान घऱातून बाहेर पडण्यावर पूर्ण बंदी असणार आहे. जिथे आहात तिथेच थांबा.

३) करोनाशी लढा देण्यासाठी सोशल डिन्स्टन्सिंग हा एकमेक पर्याय आहे.

४) लोकांना सोशल डिन्स्टन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे असं वाटत आहे. पण हे चुकीचं आहे. कुटुंबातील प्रत्येकाला हे लागू आहे. पंतप्रधानांही लागू आहे. एक चुकीचा विचार तुमच्या कुटुंबातील, मित्रांना आणि संपूर्ण देशाला धोक्यात घालत आहे.

५) करोनाची लागण झालेली एक व्यक्ती फक्त आठवडा आणि १० दिवसांत शेकडो लोकांपर्यत हा आजार पोहोचवू शकते. आगीप्रमाणे हा आजार पसरतो.

६) घराची लक्ष्मणरेषा ओलांडू नका.

७) काही देशांनी करोनावर नियंत्रण मिळवलं आहे त्यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. या देशातील नागरिक अनेक आठवडे घराबाहेर पडले नाहीत. या नागरिकांनी सर्व सूचनांचं पालन केलं. आपल्या समोरही फक्त हा एकच मार्ग आहे.

८) घरातून बाहेर निघायचं नाही. काहीही झालं तरी घरात राहायचं आहे. पंतप्रधान ते गावातील छोट्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाने सोशल डिन्स्टन्सिंग पाळलं पाहिजे. करोनाची साखळी तोडायची आहे.

९) जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा होईल यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

१०) घरात असताना त्या लोकांचा विचार करा जे आपलं कर्तव्य निभावताना स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत.

११) करोनाशी लढण्यासाठी १५ हजार कोटींची तरतूद

१२) २१ दिवसांचा लॉकडाउन मोठा कार्यकाळ आहे. पण तुमच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं असून हा एकमेव मार्ग आहे. प्रत्येक भारतीय याचा सामना करेल आणि विजय प्राप्त करेल याची खात्री आहे.

१३) आपली आणि आपल्या लोकांची काळजी घ्या. कायद्याचं पालन करा. विजयाचा संकल्प करत ही बंधने स्विकारा

१४) हे २१ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून जर आपण योग्य पालन केलं नाही तर आपण २१ वर्ष मागे ढकलले जाऊ

१५) अनेक अफवा अशावेळी पसरतात. कृपया कोणतीही अफवा पसरवू नका आणि त्यापासून सावध राहा. राज्य सरकार, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालू नका. प्रत्येक नागरिक नियमांचे पालन करेल अशी अपेक्षा आहे.