पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाकरेंना फोन

0
201

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर बनत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी महाराष्ट्रातील मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीवर चर्चा केली आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आपत्तीत अडकलेल्या लोकांना सुरक्षित राहावे अशी शुभेच्छा दिल्या होत्या. मुसळधार पावसामुळे मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एनडीआरएफची अनेक पथके बचाव कार्याच्या कामात व्यस्त आहे. दरम्यान, महाडमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सैन्याकडे मदत मागितली होती.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूराच्या पाण्यामुळे परिस्थिती अद्याप हाताबाहेर आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोन आल्याचे सांगितले. “काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे. त्यानुसार लष्कर, हवाई दल, नेव्ही, एनडीआरएफ सर्वांकडून मदतकार्य आणि बचावकार्य करण्यात येत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“गेल्या चार पाच दिवसांपासून मी आढावा घेत आहे. आपल्याला काही शब्दांची व्याख्या बदलावी लागणार आहे. अतिवृष्टीच्या पलीकडे जाऊन पाऊस होत आहेत. या सगळ्या संकटाला आपण सामोरं जात आहोत. काल पंतप्रधानांचा फोन आला होता. त्यांनी सहकार्याचं वचन दिलं आहे मदतकार्य आणि बचावकार्य सुरु आहे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जीवितहानी होऊ नये हा प्रयत्न असणार आहे. पुरात अडकलेल्यांना वाचवण्यावर व नदी परिसरातील नागरिकांच्या स्थलांतरावर भर देण्यात येत आहेत. डोंगर उतारावरील लोकांनी स्थलांतर करावे असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

“धरणं आणि नद्या ओसंडून वाहत आहे. काही ठिकाणी धरणाचं पाणी सोडावं लागत आहे. त्यानुसार नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरु आहे. हे सगळं करत असताना करोनाचं संकट टळलेलं नाही. तळई येथे दरड कोसळल्यानंतर काही जणांना वाचवू शकलो. पण आता ३० ते ३५ लोक दुर्देवाने मृत्यूमुखी पडले आहेत. नागपुरातही अतिवृष्टी होत आहे. महाबळेश्वरातही जोरदार पाऊस सुरु असून याआधी कधी पडला नाही तेवढा पाऊस पडत आहे. परदेशातही अशा अतिवृष्टी आणि पुराच्या बातम्या आपण पाहत आहोत. सर्व मिळून संकटाला तोंड देत आहोत,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणातील नद्या क्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगबुडी, वशिष्टी, काजळी या नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले होते.