“न्याय झाला पण…”; उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली खंत

0
501

हैदराबाद, दि.६ (पीसीबी) – हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. या चकमकीवर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पीडितेला न्याय देण्यासाठी वापरलेली पद्धत अयोग्य असल्याची खंत उज्ज्वल निकम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवली. झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी हैदाबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेले. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले.

“पोलीस बेसावध आणि निष्काळजी होते का? बलात्काराचे आरोपी ठार झाल्याचा आनंद असला, तरी पोलिसांच्या कृत्याला जाहीर समर्थन दिल्याने ते कायदा हातात घेण्याची भीती आहे,” असे मत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

मुळात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींच्या हातात बेड्या असतात. त्या असतानाही त्यांनी शस्त्र हिसकावून घेतली असे गृहित धरले तरी हा गोळीबार योग्य नव्हता. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते, असेही निकम यांनी सांगितले.