नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून पाणीटंचाईवर मात करा; भोसरीतील प्रभाग स्वीकृत सदस्यांची महापौरांकडे मागणी

0
795

भोसरी, दि. २४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहराला सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यावर थोड्या प्रमाणात मात करण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करण्यासाठी प्रशासनाला जागे करा, अशी मागणी भोसरीतील प्रभाग स्वीकृत सदस्यांनी केली आहे.

प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव, सागर हिंगणे, संतोष मोरे गोपीकृष्ण धावडे या चौघांनी महापौर राहुल जाधव यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे, “शहराला सध्या पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. शहरात पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध आहेत. विहीर, हातपंप व अन्य नैसर्गिक स्त्रोतांचा वापर वाढल्यास धरणातील पाण्याचा वापर काही प्रमाणात कमी होईल. त्यातून पाणी टंचाईवर थोड्या प्रमाणात का होईना मात करता येईल. परंतु, नैसर्गिक स्त्रोतांचा नागरिकांनी वापर करावा यासाठी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही केली जात नाही, हे मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण या ज्वलंत प्रश्नावर प्रशासनातील अधिकाऱ्यांना जागे करण्याचे काम करावे. पाण्यासाठी नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करावा यासाठी नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी आपणही पुढाकार घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.”