मुंबई, दि. १९ (पीसीबी) – राजकारणात कोणी संपत नसते, पण सत्तेचा उपयोग करून सत्ता आणायची, सत्तेसाठी काहीही करायचे हा गेल्या काही वर्षांत शरद पवार यांनी आणलेला भ्रष्ट संस्कृतीचा पॅटर्न संपेल. तो लोकांना पसंत पडेल असे वाटत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्यांशी संबंधित काही निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशांनुसार, पत्रांनुसार घेण्यात आले होते, त्यामुळे पवारांचा संबंध या घोटाळ्याशी आहे, असा आरोप त्यांनी केला.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. लोकसभेला त्यांनी जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला तिथे आघाडीचा पराभवच झाला होता. बारामतीकडून त्यांचा वापर होत आहे. आपल्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालविल्या जाताहेत, हे कदाचित आता त्यांना कळले असणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.