Maharashtra

निवडणुकांमुळेच राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला – उध्दव ठाकरे

By PCB Author

November 21, 2018

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – निवडणुका जवळ आल्या की, राममंदिराचा विषय पुढे येणारच,  आणि त्यामुळेच आम्ही हा मुद्दा हाती घेतला आहे, यावर आमच्यावर टीका होईलच, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपसह विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.

पत्रकार संघटनेच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ठाकरे यांनी अयोध्या दौरा आणि राम मंदिर या विषयावर भाष्य केले. मी राम मंदिराचा मुद्दा हाती का घेतला? अयोध्येचा दौरा आम्ही करतोय म्हणून आमच्या वर विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे. परंतु, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला आहे, त्यामुळे आमच्यावर टीका होऊ द्या, असेही उद्दव ठाकरे म्हणाल्या.

निवडणुकीच्या काळात भाजपला राम मंदिराची आठवण येते. निवडणुका झाल्या की, भाजपला राम मंदिराचा विसर पडतो, अशीही टीका ठाकरे यांनी यावेळी केली. दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तर रविवारी (दि.२५) अयोध्या दौऱ्यात कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल.