नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उपपंतप्रधान करावे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद देण्यात यावे. तसेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे पक्षाच्या नेतृत्वाची धुरा द्यावी, असा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते संघप्रिय गौतम यांनी पक्षाला दिला आहे. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राज्यसभेवरच ‘फोकस’ करावा ,असे त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धार्मिक कार्यास पाठवले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी हे देशातील सर्वांत मोठे नेते आहेत. मात्र, २०१९ मध्ये ‘मोदी लाट’ येण्याबाबत शंका आहे, असे ते म्हणाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ‘मोदी मंत्र’ पुन्हा काम करण्याची शक्यता कमीच आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हे मान्य आहे. मात्र, ते यावर बोलू शकत नाहीत.
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात जनतेत रोष आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की, आता निवडणुका घेतल्या तर भाजपचा काही राज्य वगळता पराभव होईल, असा इशारा त्यांनी दिला. योजना आयोगाचे नाव बदलणे, सीबीआय, आरबीआयच्या कामात सरकारच्या हस्तक्षेपावर गौतम यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे.