Bhosari

निगडी ओटास्कीम येथील घरांमध्ये पाणी शिरल्याने संतप्त नागरिकांचे भक्ती-शक्ती चौकात आंदोलन

By PCB Author

July 16, 2018

भोसरी, दि. १६ (पीसीबी) – शहर परिसरातील निगडी, ओटास्कीम येथे असलेल्या मौलाना आझाद नगर आणि सम्राटनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संतप्त नागरिकांनी मुंबई-पुणे महामार्गावरील भक्ती-शक्ती चौकात वाहने आढवून आंदोलन सुरु केले. यामुळे परिसरात तनावपूर्ण वातावरण होते. तर काही काळ मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हपत्या भरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील निगडी, ओटास्कीम येथील मौलाना आझादनगर आणि सम्राटनगर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. येथे काही अनधिकृत घर आणि टपऱ्यांमुळे पावसाचे पाणी तुंबत होते. तसेच ते पाणी स्थानिक नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आणि घरातील सामानाची नासधूस झाली. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी भक्ती-शक्ती चौकात येऊन आंदोलन केले. त्यामुळे काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्यात आले.

दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटना स्थळी भेट देऊन पाणी हटवण्याचे काम सुरु केले आहे.