Maharashtra

नारायण राणेंनी शिवसेना-भाजपशी नाही तर रामदास आठवलेंशी संपर्क साधावा – रामदास कदम

By PCB Author

September 05, 2019

रत्नागिरी, दि. ५ (पीसीबी) – विधानसभेच्या तोंडावर कोकणात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी नारायण राणेंच्या शिवसेनेत घेण्याबाबत वक्तव्य केले आहे.

नारायण राणे आता कुठल्या पक्षात जाणार याची मला माहिती नाही, मात्र राणेंनी आता रामदास आठवले यांच्याकडे संपर्क साधावा, असा टोला कदम यांनी लगावला. यावेळी रामदास कदमांनी नारायण राणेंचा खरपूस समाचार घेतला आहे. नारायण राणे यांना शिवसेनेत घेण्यास शिवसैनिकांचा प्रचंड विरोध आहे. भाजपमध्ये ते गेले तर युती करायची की नाही याबाबत सुद्धा शिवसैनिकांच्या मनात खदखद आहे. भाजपनेही राणेंना पक्षात घेऊ नये अशी शिवसैनिकांची भावना आहे, असे रामदास कदम म्हणाले.

दरम्यान, नारायण राणे, शरद पवार आणि राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार बाबासाहेब कुपेकर यांची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती. मात्र अपेक्षित मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे राणे दिल्लीत काँग्रेसच्या दरबारी गेले, असे रामदास कदम यांनी सांगितले.