मुंबई, दि. १६ (पीसीबी) – आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसेच आपले पुत्र माजी खासदार निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदासंघातून स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असेही त्यांनी जाहीर केले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मुंबईतील रंगशारदामध्ये मेळावा झाला. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. आघाडी किंवा युतीत जाणार नाही, असे नारायण राणे यांनी मेळाव्यात स्पष्ट केले. तसेच युतीत माझ्या नावाची काही जणांना कावीळ झाली असल्याचे ते म्हणाले.