नारायण राणेंकडून माझ्या हत्येची सुपारी ; भाजप नेते संदेश पारकरांचा आरोप

0
826

कणकवली, दि. ८ (पीसीबी) – स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मला ठार मारण्यासाठी सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप  भाजपचे नेते संदेश पारकर यांनी केला आहे. राणेंच्या गैरकारभाराविरोधात मी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे बिथरलेल्या राणेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचे पारकर यांनी म्हटले आहे.   

पारकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कणकवली शहरातील शिवाजी महाराजांचा स्थलांतरचा मुद्दा असेल, ९०० कोटींचा कचरा प्रकल्प असेल आणि  राणे यांची जिल्ह्यातील ‘विश्वास यात्रा’ असेल. याबाबत मी अनेकदा मुद्द उपस्थित केले होते. त्यामुळे बिथरलेल्या राणे यांनी आक्रमक होऊन मला मारण्यासाठी कणकवली शहरातील गुंड पाठवले होते.

दरम्यान, पारकर यांच्या या आरोपाला शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही  दुजोरा दिला आहे. विकासाच्या मुद्यावर कणकवलीकरांनी नगराध्यक्ष म्हणून समीर नलावडे यांना निवडून दिले.  मात्र त्यांच्या कडून गुंडगिरी करून गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्र स्वाभिमान हा गुंडांचा पक्ष आहे, असा आरोप  नाईक यांनी करून अशी गुंडगिरी शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

दरम्यान, पारकर आणि नाईक यांच्या आरोपांवर राणे कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.