नामदेव ढाकेंनी आपल्या मर्यादेत रहावे

0
332

पिंपरी, दि.29 (पीसीबी): पार्थ पवारांचा लोकसभा निवडणूकीमध्ये पराभव झाला त्यामुळे पालक मंत्री अजितदादा पवार पिंपरी चिंचवड शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, असे सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वक्तव्य केले आहे. त्याला पालिकेतील विरोधीपक्ष नेते नाना काटे यानी साडतोड उत्तर दिले आहे. नामदेव ढाके  हे पहिल्यांदा तेही लाटेत निवडून आलेले आहेत, लाटेत निवडून आलेल्यांनी असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. दादांच्या जिव्हारी लागण्याचे काहीच कारण नाही. राज्यात महाआघाडीचे सरकार आल्यानंतर दादा पुणे जिल्हाचे पालकमंत्री झाले हेच खंरतर भाजपा पदाधिका-यांच्या जिव्हारी लागले आहे, असे ढ़ाके यानी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. अजितदादा काम करतात की नाही हे मागील १० ते १५ वर्षांमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी प्रत्यक्ष अनुभवलेले आहे. त्यामुळे एखाद्या अडाण्या माणसाप्रमाणे पक्षातील वरीष्ठ नेत्यांना बर वाटाव म्हणून काहीही वक्तव्ये करणे चुकीचे आहे. अजितदादाच्या विरोधात बोलण्याची कुवत तरी आपली आहे काय ?, असा सवाल काटे यानी केला आहे.

अजितदादा किती कार्यक्षम आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. अजितदादा दर शुक्रवारी पुणे येथील कॉन्सिल हॉल मध्ये पुणे जिल्हासह पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वरीष्ठ अधिकारी यामध्ये विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परीषदेचे मुख्याधिकारी, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी यांच्य़ासोबत  मिटींग घेतात. त्या मिटींगमध्ये जिल्हातील सर्वपक्षीय खासदार आमदार पालिकेचे पदाधिकारी जिल्हा परीषदेचे पदाधिकारी असतात. ते सर्व कामकाजा आढावा घेऊन अधिका-यांना सुचना , आदेश देतात. अजितदादा फक्त पिंपरी चिंचवडचे पालकमंत्री नसून ते उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री सुध्दा आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागते. राज्यातील प्रत्येक  जिल्हांची माहिती घेत असतात प्रसंगी त्या जिल्हास भेट देतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराकडे पाठ फिरवली असे म्हणणे योग्य नाही. केवळ राजकारण करायचे म्हणून असे फुसके आरोप नामदेव ढाके करीत आहेत. त्यामुळे नेत्यांची शाबसकी मिळविण्यासाठी माकडा सारख्या उड्या मारु नयेत, आपण आपल्या मर्यादेत रहावे, असा इशारा काटे यानी दिला आहे.