नरेंद्र मोदींना पाठिंबा नसेल, तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणू – मुख्यमंत्री फडणवीस

8305

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – काँग्रेस-राष्ट्रवादीने एका व्यासपीठावर यावे. तुमचे १५ वर्षांचे राजकारण आणि आमची चार वर्षांची सत्ता. या चार वर्षांत आम्ही उजवे ठरलो नाहीत, तर आगामी निवडणुकांना सामोरे जाणार नाही, असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. ३) विरोधकांना दिले. तसेच युती संपली म्हणून भाजपने मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा आयोजित केलेली नाही, तर या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदींना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा आयोजित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिला, तर या दोन्ही मतदारसंघातून दिल्लीला त्यांचे दोन खासदार पाठवू. अन्यथा आमचे खासदार निवडून आणू, असा स्पष्ट इशारा त्यांनी शिवसेनेला दिला.

निगडी, प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, दिलीप कांबळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आमदार चंद्रकांत हाळवणकर, प्रशांत ठाकूर, बाबुराव पाचार्णे, योगेश टिळेकर, खासदार अमर साबळे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापौर राहुल जाधव, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्यासह मावळ आणि शिरूर मतदारसंघातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मावळ आणि शिरूरसाठी मदनलाल धिंग्रा मैदानावर कोणाच्या विरोधात भाजपने सभा घेतलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी कोण आहे, हे समजण्यासाठी ही सभा आहे. मावळ आणि शिरूरमध्ये सभा घेतोय याचा अर्थ युती संपली का?, असा प्रश्न काहींना पडला आहे. या दोन्ही मतदारसंघात नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. २०१४ मध्ये मोदी लाट होती म्हणून खासदार निवडून आणले म्हणणाऱ्यांना २०१९ मध्ये आम्ही सुनामी आणण्यासाठीच ही सभा घेतली आहे. आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारेच खासदार निवडून आणले जातील. मित्रपक्षांनी मोदींना पाठिंबा दिला, तर त्यांचे खासदार पाठवू. अन्यथा आमचे खासदार निवडून आणू. मोदींना पंतप्रधान करणे ही देशाची आवश्यकता आहे. त्यांच्यासारखे कणखर नेतृत्व देशाला हवे आहे. त्यामुळे त्यांना जे पाठिंबा देतील, त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असेच खासदार निवडून आणायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेस-राष्ट्रवादीला भाजपचे खुले आव्हान आहे. त्यांनी एका व्यासपीठावर यावे. तुमचे १५ वर्षांचे राजकारण आमची चार वर्षाची सत्ता. या चार वर्षात आम्ही उजवे ठरलो नाहीत, तर निवडणुकीला सामोरे जाणार नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे ५० हजार कोटी रुपये जमा केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने ८ हजार कोटी दिले होते. या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सिंचनाच्या नावावर स्वतःची घरे आणि तिजोरी भरली. भाजप सरकारने शेतकऱ्यांना एफआरपी मिळवून दिला. रस्ते आणि सिंचन क्षेत्रात सरकारने मोठ्या प्रमाणात काम केले. तुम्ही तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेचे पैसे लाटले आणि आम्हाला विचारता तुम्ही काय केले?, असा सवाल त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला केला.

अनधिकृत बांधकामांबाबत न्यायालयाने दिलेला निकाल हा आरक्षणाच्या जागेवरील बांधकामांबाबत दिला आहे. आरक्षणाच्या जागेवरील अनधिकृत बांधकामे नियमित करायचे असेल, तर शेजारीच आरक्षणासाठी दुसरी जागा उपलब्ध असण्याचा कायदा भाजप सरकारने केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील एकाही अनधिकृत बांधकामाला हात लावला जाणार नाही. शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित केल्याशिवाय भाजप सरकार स्वस्थ बसणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पिंपरी-चिंचवडसाठी १५ वर्षात आयुक्तालय सुरू करू शकले नाही. भाजप सरकारने अवघ्या चार वर्षांत पोलिस आयुक्तालय सुरू केले. शहरात मेट्रोचे काम सुरू केले. शास्तीकर रद्दे केला. शहराचा पाण्याचा प्रश्नही भाजप सरकार निश्चितपणे सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले.”

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित होते. राज्यात भाजपची सत्ता येताच गेल्या चार वर्षांत मी स्वतः आणि आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा करून प्रलंबित असलेले ९० टक्के प्रश्न सोडवले आहेत. शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची मागणी होत होती. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली. पुढील दहा वर्षांत शहराला पाणी समस्येला सामोरे जावे लागणार नाही यासाठी पवना, इंद्रायणी आणि भामा-आसखेड या तीन धरणातून अतिरिक्त पाण्याचा कोटा मंजूर केला. अमृत योजनेअंतर्गत शहरासाठी ३०० कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले. शहराचा स्मार्ट सिटी योजनेतही समावेश केला. प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यातून सर्वात जास्त निधी पिंपरी-चिंचवडला दिला. या येजनेअंतर्गत शहरात सुमारे २० हजार घरे उभारण्यात येणार आहेत. मोशी कचरा डेपोच्या भोवती बफर झोनची हद्द १०० मीटरपर्यंत आणले. नागपूरसारखेच पिंपरी-चिंचवडमध्येही मेट्रोचे काम वेगाने व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून काम प्रगतीपथावर आणले. शहरासाठी वैद्यकीय महाविद्यालय उपलब्ध करून दिले.

शहराचे काही मोजकेच प्रश्न आता प्रलंबित राहिले आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी एफएसआयचे धोरण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याचा विचार करावा. नदी सुधार प्रकल्पामुळे शहरातील नद्यांचे पुनरूज्जीवन होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नदी सुधार प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी प्राधान्याने मार्गी लावावा. पुण्यासारखेच पिंपरी-चिंचवड शहर एज्युकेशन हब व्हावे यासाठी प्राधिकरणामार्फत जागा उपलब्ध करून द्यावी. हिंजवडीतील वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी एलिव्हेटेड मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. तसेच सलग उड्डाणपुलांमुळेदेखील हा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांत लक्ष घालावा. शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी पवना जलवाहिनीचा प्रश्न समजुतीने सोडवण्यासाठी मावळमधील भूमीपुत्रांना विश्वासात घ्यावे. त्यांच्या संमतीनेच पवना जलवाहिनीचा प्रकल्प मार्गी लावावा. महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने माझ्यावर आणि आमदार महेश लांडगे यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे महापालिकेत प्रथमच भाजपची सत्ता आली. आता मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षाने आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवावा. या दोन्ही मतदारसंघाचे खासदार हे भाजपचेच असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आमदार बाळा भेगडे, प्रशांत ठाकूर, सुरेश हाळवणकर, महेश लांडगे यांनीही मनोगत व्यक्त केले.