नथुरामने गांधीजींची तर साध्वी प्रज्ञा यांनी भारताच्या आत्म्याची हत्या केली – कैलाश सत्यार्थी

0
513

नवी दिल्ली, दि. १८ (पीसीबी) – सत्ता आणि राजकारणाच्यापलीकडे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्थान आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या सारखे लोक भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. भाजपाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे अशी मागणी नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केली आहे.

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधील भाजपा उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेचे कौतुक करताना त्याला देशभक्त म्हटले होते. साध्वी प्रज्ञा यांच्या या विधानावरुन वाद झाल्यानंतर लगेच त्यांनी घुमजाव करत माफी मागितली. मला महात्मा गांधींबद्दल आदर आहे. त्यांनी देशासाठी केलेले कार्य कधीच विसरता येणार नाही असे साध्वी प्रज्ञा नंतर म्हणाल्या.

गोडसेने गांधींच्या शरीराची हत्या केली. पण प्रज्ञा सारखे लोक आत्मा, अहिंसा, शांतता, सहिष्णूता आणि भारताच्या आत्म्याची हत्या करत आहेत. महात्मा गांधी हे सत्ता आणि राजकारणाच्या पलीकडे होते. भाजपाने छोटया फायद्याचा मोह सोडून त्यांना तात्काळ पक्षातून काढून राजधर्माचे पालन करावे असे सत्यार्थी यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.