Maharashtra

नकट्या नटीने लाल चौकात न फडकलेल्या तिरंग्यासाठी ठिणग्या उडवाव्यात – शिवसेनेची जहरी टीका

By PCB Author

October 28, 2020

मुंबई, दि. २८ (पीसीबी) : काश्मीरात सध्या राष्ट्रपती राजवट आहे. म्हणजे तेथे दिल्लीचा हुकूम चालतो, पण लाल चौकात तिरंगा फडकवणे हा गुन्हा ठरला. मग 370 कलम हटवल्यावर नक्की बदलले काय? असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. मुंबईत आजही तिरंगा फडकतोय. म्हणजे हा भाग पाकड्यांचा नाही. जेथे पाकड्यांची मिजास चालते तेथेच तिरंग्याचा अपमान होतो. नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी संतापाच्या ठिणग्या उडवाव्यात. खरी मर्दानगी आणि मर्दानी तेथेच आहे!, असा टोलाही शिवसेनेनं सामनातून केंद्र सरकारसह अभिनेत्री कंगना रनौतला लगावला आहे.

काश्मीरात नक्की काय सुरू आहे याबाबत शंकाकुशंकांना खतपाणी मिळणाऱ्या घटना, घडामोडी रोज घडताना दिसत आहेत. काश्मीरबाबत देशवासीयांच्या भावना तीव्र आहेत. काँग्रेसच्या काळात काश्मीर हातातून गेलेच होते ते भाजपने परत मिळवले हे जे सांगितले जाते ते खरे असेल, तर श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्यास विरोध का करण्यात आला? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. काश्मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे हे सिद्ध करण्यासाठीच मोदी सरकारने 370 कलम हटवून काश्मीरच्या पायांतील गुलामीच्या बेड्या तोडून फेकल्या. त्याबद्दल सगळ्यांनीच कौतुकाचा वर्षाव केला.

370 कलम हटवून भारतमातेचा गुदमरलेला श्वास मोकळा केला. हे सर्व मोदी आणि शहा यांचे राज्य दिल्लीत असल्यामुळेच घडले, पण 370 कलम हटवूनही भाजप कार्यकर्त्यांना चार दिवसांपूर्वी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवता आला नाही. लाल चौकात तिरंगा फडकवण्यास गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांना काश्मीरच्या पोलिसांनी रोखले व बंदी बनवले. हे चित्र काय सांगते? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

काश्मीरची स्थिती अजूनही सुधारलेली नाही. जे बरे दिसत आहे तो फक्त वरवरचा मेकअप आहे. आता काश्मीरातील तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी 370 कलम पुन्हा आणण्यासाठी लढा उभारण्याचे ठरवले आहे. डॉ. फारुख अब्दुल्ला या बेडकाने तर ‘डराव डराव’ करत असे जाहीर केले की, 370 कलम पुन्हा आणण्यासाठी आम्ही चीनची मदत घेऊ. हा सरळसरळ राष्ट्रद्रोहच आहे. दुसरी ती बेडकीण मेहबुबा मुफ्ती. तिने तर ‘काश्मीरात तिरंगा कसा फडकतो ते पाहू’ असे आव्हान दिले आहे. या दोन्ही नेत्यांची भाषा फुटीरतेची आणि चिथावणीची आहे. तिरंग्याचा अवमान भारत कधीच सहन करणार नाही, असा इशारा शिवसनेनं दिला आहे.

मोदी-शहा यांनी हे स्वतंत्र राष्ट्र बरखास्त केले हे खरे. पण आजही काश्मीरात तिरंगा फडकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर कसे व्हायचे? 370 कलम हटविल्यानंतरही स्थिती ‘जैसे थे’ आहे व लोकांवर बंधने आहेत. काही बडय़ा उद्योगपतींनी देशभक्तीने प्रेरित होऊन काश्मीरात मोठी गुंतवणूक करण्याचेही जाहीर केले, पण वर्ष उलटून गेले तरी तेथे एक रुपयाचीही गुंतवणूक होऊ शकलेली नाही, असा टोलाही शिवसेनेनं लगावला.