धुलीवंदनाच्या दिवशी कासारसाई धरणात बुडून दोन मित्रांचा मृत्यू

0
572

तळेगाव, दि. २२ (पीसीबी) – धुलीवंदनाच्या दिवशी तळेगावजवळील कुसगावमध्ये असलेल्या कासारसाई धरणात दोन जिवलग मित्रांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार (दि.२१) दुपारच्या सुमारास घडली.

रित्त्विक संजय गिरी (वय २१, रा.बिजलीनगर, चिंचवड,पुणे) आणि शुभम टेकचंद राहांगडाले (वय २१,सध्या रा.वाकड, पुणे मूळ रा.गोरेगाव, ता.गोरेगाव, जि.गोंदिया, नागपूर) असे मृत दोघा मित्रांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी धुलीवंदनाच्या दिवशी कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रित्त्विक आणि शुभम पोहण्यासाठी गेले होते. यावेळी पाणलोट क्षेत्राचा अंदाज न आल्याने ते दोघेही धरणात बुडाले. बराच वेळ होऊन देखील रित्त्विक आणि शुभम कुठे आढळून न आल्याने त्यांच्या मित्रांनी स्थानिकांच्या मदतीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने एनडीआरएफ टीमला पाचारण केले. एनडीआरएफच्या जवानांनी सायंकाळी उशीरा रित्त्विक आणि शुभम या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तळेगावातील रुग्णालयात या दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. तळेगाव पोलीस तपास करत आहेत.