‘धीर सोडू नका. दोन दिवसांत मदत जाहीर करू’, मुख्यमंत्र्यांचे ओल्या दुष्काळग्रस्तांना आश्वासन

0
222

उस्मानाबाद,दि.21(पीसीबी) : येत्या दोन दिवसात मदतीचा निर्णय जाहीर करु, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल. मुख्यमंत्री आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तुळजापूरमधील काटगाव इथे पाहणी केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही, जे करुन ते तुमच्या समाधानासाठी करु, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणाले की, “मी तुम्हाला नवीन नाही किंवा तुम्ही मला नवीन नाही. तुमच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो. या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने झाली, वादळ आलं आणि जाता जाता पावसाने तडाखा दिला आहे. पुढचे सात-आठ दिवस परतीचा पाऊस कायम असेल. तुम्ही माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहात. संवग लोकप्रियतेसाठी मी घोषणा करणार नाही. मी जे बोलते ते करतो, पण जे करु शकत नाही ते बोलणार नाही. तुम्हाला बरं वाटावं, तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकडा घोषित करायला आलेलो नाही. तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे. तुम्हाला जास्तीत जास्त ताकद द्यायला आलो आहे.”

“आज-उद्या मंत्रिमंडळाची बैठक होईल. तोपर्यंत पंचनामे 80-90 टक्के पूर्ण झाले आहेत. अंदाज आलेला आहे. लवकरात लवकर पूर्ण ताकदीनिशी तुमचं आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी हे सरकार वचनबद्ध आहे. मी आकडे सांगायला आलेलो नाही. ते करु तुमच्या सुख-समाधानासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका. पुन्हा आपलं आयुष्य जोमाने सुरु करु यासाठी तुम्हाला दिलासा द्यायला आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला मी इथे आलोय. काळजी करु नका, हे तुमचं सरकार आहे. तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी मदत केल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला देतो,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्तांना दिली.