Maharashtra

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करणार – मुख्यमंत्री

By PCB Author

August 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) –  धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टीस) संस्थेने अहवाल तयार केला आहे. हा अहवाल या महिन्याअखेर  राज्य सरकारला प्राप्त होईल. त्यानंतर वैधानिक कार्यवाही पूर्ण करून केंद्र सरकारकडे आरक्षणासंदर्भात शिफारस केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  धनगर समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.   

यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ. विकास महात्मे या वेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आदिवासी विकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग कल्याण विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता व धनगर समाज समितीचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, टाटा इन्स्टिट्यूटने  अभ्यासपूर्ण अहवाल तयार केला आहे. तो अहवाल या महिन्याच्या अखेरीस  प्राप्त होताच सरकार त्यावर तत्काळ कार्यवाही करेल. तसेच धनगर समाजाच्या मेंढपाळांना त्यांच्या शेळ्या मेंढ्यांना पावसाळ्यात वनक्षेत्रात चराईसाठी मान्यता देण्याचा  आदेशही यावेळी त्यांनी दिला.

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याबाबतचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असले तरी शासन याबाबत सकारात्मक असून तशी भूमिका शासनाकडून न्यायालयात मांडण्यात येईल. समाजातील तांडा वस्ती सुधार योजनेसाठी वाढीव निधी उपलब्ध करून देणार आहे. रोगांनी किंवा विषबाधेने शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळण्याबाबतची विमा योजना सुरू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.