Maharashtra

धक्कादायक; फेसबुक पोस्ट टाकल्याच्या कारणावरून तरूणाचा खून

By PCB Author

July 23, 2019

लातूर, दि.२३ (पीसीबी) – फेसबुकवर पोस्ट टाकल्यावरून लातूरमधील निलंग्यात तरूणाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. निलंगा तालुक्यातील शिरोळ ( वांजरवाडा) येथील सोमवारी सकाळी ही घटना घडली. राजेंद्र जाधव, असे मृताचे नाव. तर सुरेश दिलीप जाधव असे आरोपीचे नाव आहे.

राजेंद्रला भोसकल्यानंतर सुरेश स्वतःहून शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात हजर राहिला झाला होता. सोमवारी गावात तणावाची शक्यता ओळखून अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. याप्रकरणी सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल असून एकाला अटक केली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

प्रसाद जाधव यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सात जणांविरूद्ध कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातील सुरेश दिलीप जाधव यास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोळ वांजरवाडातील एका हॉटेलसमोर फिर्यादी प्रसाद जाधव आणि राजेंद्र जाधव बोलत थांबले होते. यावेळी सुरेश जाधव याने जुन्या भांडणाची कुरापत काढली. यावेळी गणेश दिलीप जाधव, संतोष दिलीप जाधव, विक्रम विश्वास जाधव, विश्वास रावसाहेब जाधव, दिलीप रावसाहेब जाधव, भरत रावसाहेब जाधव (सर्व रा़ शिरोर वांजरवाडा) यांनी भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली़ याप्रसंगी राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या पाठीत हातातील चाकूने वार करून गंभीर जखमी केले. राजेंद्र जाधव यास उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.