Maharashtra

धक्कादायक: ग्रामस्थांना मारण्यासाठी विहिरीत कालवले विष

By PCB Author

July 19, 2019

गेवराई, दि. १९ (पीसीबी) – विहिरीच्या पाण्यात विष कालवून ग्रामस्थांना मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र पाण्याचा रंग बदलल्याने वेळीच ही बाब लक्षात आल्याने हजारो नागरिकांचा जीव वाचला. ही घटना बुधवार (दि.१७) गेवराई तालुक्यातील भोजगावातून उघडकीस आली.

गेवराई पोलिसांनी या गावाला भेट देऊन पंचनामा करून कीटकनाशकच्या दोन्ही बाटल्या जप्त केल्या. तसेच विहिरीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. आणि विहिरीतील विषाक्त पाणी उपसले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या भोजगावातील रावसाहेब शिंदे यांच्या विहिरीच्या पाण्यात फिनॉलफॉस या कीटकनाशकाच्या दोन बाटल्या कालवल्या. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी रावसाहेब शिंदे यांनी गेवराई पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या विहिरीतील पाणी ग्रामस्थांच्या पिण्यात आले नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस जमादार सतीश खरात करत आहेत.