शिर्डी, दि. १७ (पीसीबी) – मला लोकसभेला राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, याचे कारण मी सुशिक्षित आहे, माझ्यावर एकही केस नाही. राष्ट्रवादीमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू यात माझ्यासारख्याचे काय काम आहे. म्हणून मला उमेदवारी दिली नसेल. मात्र, राष्ट्रवादीतील नेत्यांना दोन वर्षानंतर भेटण्याचे ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे, तर येरवडा जेल असेल, असा टोला भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी लगावला.
महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी संगमनेर मतदारसंघात सुजय विखे- पाटील यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली.
ईडीची केस झाली तर यांच्या डोळ्यात पाणी आले, अशी टीका अजित पवार यांचे नांव न घेता केली. हे पाणी कधी जनतेसाठी का नाही आले ?, असा सवाल सुजय विखे यांनी यावेळी केला.
राष्ट्रवादीवाले म्हणतात वातावरण बदलले आहे. आमच्या सभांना जास्त गर्दी आहे. कोणाच्या तर अमोल कोल्हेच्या सभेला गर्दी आहे. तीन महिन्यांत अमोल कोल्हे शेतकरी झाला. कांदा, सोयाबीन, ऊस सगळं यांना समजले. मग आम्ही काय तीन वर्षांपासून शेतकरी नाही का? निवडणूक झाल्यावर मी देखील एक मालिका काढणार आहे, असा टोला सुजय विखे यांनी लगावला.