Maharashtra

दोन तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही – सुधीर मुनगंटीवार

By PCB Author

February 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) – दोन तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही, जे भाजपमधून गेले ते मुळात भाजपचे नव्हते, असं वक्तव्य भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

भाजपची सूज उतरतेय असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते त्यावर मुनगंटीवारांनी उत्तर दिलं आहे “दोन तीन नगरसेवक गेल्याने तारे तोडण्याचे कारण नाही. सत्ता गेल्यानंतरही कोल्हापूरमध्ये माजी खासदार धनंजय महाडिकांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे जे भाजपमधून गेले ते मुळात भाजपचे नव्हते. दोन-तीन मंडळी भाजपातून गेल्याने तुमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. यांनी राज्यात सेवेचे काम सुरु ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे”, असं मुनगंटीवार म्हणाले.

दरम्यान, “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल करत सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या राम मंदिर ट्रस्टवरुन वर केलेल्या वक्तव्याचाही समाचार घेतला.