Maharashtra

दोन आकडी खासदार निवडून येत नाहीत, ते पंतप्रधानपदाचे स्वप्न बघतायेत; मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला

By PCB Author

February 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) –  राष्ट्रवादीचे लोकसभेला कधीही दोन आकडी खासदार निवडून आलेले  नाहीत, मात्र ते पंतप्रधानपदाचे स्वप्न बघत आहेत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे.  राष्ट्रवादीवाले संगीत खुर्चीचा खेळ खेळतात, असेही ते म्हणाले.  

भाजप शक्तिकेंद्र प्रमुखांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपची नसून भारताची निवडणूक आहे. ही एक देशाच्या ५ हजार वर्षांच्या इतिहासातील ऐतिहासिक संधी आहे. यापूर्वी २००९ मध्ये केंद्रात काँग्रेसचे खिचडी सरकार आले होते. त्यामुळे निर्णय घेण्यास विलंब होत होता. त्यामुळे ते वेळकाढू सरकार ठरले होते.

चौकीदाराची भीती आपल्याला नसते, तर ती कुणाला असते? असा सवाल त्यांनी केला, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘चोर चोर’ असा जोरदार कल्ला केला.  मुख्यमंत्र्यांनी यावेळी  राहुल गांधींवरही निशाणा साधला. राहुल गांधींना कुणी प्रश्न विचारत नाही, त्यामुळे ते सारखे खोटे बोलत असतात, अशी टीका त्यांनी केली.