“दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत”; भाजपचा हल्लाबोल

0
195

मुंबई, दि.२० (पीसीबी) : पनवेलमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज उभारण्याच्या नावाखाली सरकारकडून नाममात्र दरात मिळवलेल्या जमिनीचा काही भाग महामार्ग विस्तारीकरणात गेल्यानंतर त्याचा मोबदला संबंधित शिक्षणसंस्थेनं मिळवल्याचं प्रकरण समोर आलंय. महत्वाची बाब म्हणजे ही संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळतेय. एका वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्वीटरवरुन जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत. आधी सरकारकडून जमिन घ्यायची मग सरकारनेच अधिग्रहीत केली म्हणून सरकारकडून भरभक्कम मोबदला घ्यायचा. सरकार असो सहकार, स्वाहाकार हाच मंत्र हीच यांची घोषणा’, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधलाय.

जयंत पाटली हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 2004 मध्ये या संस्थेला ही जमीन देण्यात आली होती. त्यावर संस्थेनं अजूनही महाविद्यालय उभारलं नाही. मात्र, सरकारकडून मिळालेल्या 14 एकरपैकी दोन एकर जमीन सरकारच्याच भूसंपादनासाठी देऊन संस्थेनं तीसपट मोबदला मिळवल्याची माहिती मिळतेय. पनवेल तालुक्यातील शिराढोण हे गाव आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे मूळ गाव आहे. मुंबई-गोवा महामार्गालत कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या अलीकडे वसलेल्या या गावाची आकारीपड आणि गुरचरण जमीन महामार्गाला लागून आहे.

दरम्यान, मुंबई ड्रग्स प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीसह भाजपवर जोरदार टीका केलीय. मलिकांच्या या टीकेलाही केशव उपाध्ये यांनी पलटवार केलाय. नवाब मलिक मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते. तथापि, मीडिया ट्रायलमध्ये भारतीय जनता पार्टीवर टीका करून कोणी निर्दोष ठरणार नाही आणि सत्यही लपणार नाही. असत्याची कास धरून स्वतःला आरोपी करू नका, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.

अंमलीपदार्थांच्या विरोधात कारवाई करणाऱ्या एनसीबीने एका जहाजावर छापा मारून काहीजणांना पकडले. याबाबत राज्याचे नवाब मलिक पत्रकार परिषदांच्या माध्यमातून मीडिया ट्रायल चालवत आहेत आणि आरोपींना मदत होईल, अशा रितीने तपासी यंत्रणेवर टीका करत आहेत. त्यामध्ये ते पुन्हा पुन्हा भारतीय जनता पार्टीलाही ओढत आहेत. पण अशा रितीने भाजपावर टीका करून आरोपींची सुटका होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयानेच निकाल द्यावा लागतो. तपासी यंत्रणेला सातत्याने न्यायालयासमोर उभे रहावे लागत आहे. भाजपाचे कोणी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा होईलच, असंही उपाध्ये म्हणाले.