“देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा ‘तो’ दावा खोटा”; राऊतांचा गौप्यस्पोट

0
191

नाशिक, दि.२४ (पीसीबी) : देशात कोरोना लसीकरणाचा 100 कोटीचा टप्पा पार करण्यात आलाय. तशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. कोरोना विरोधातील लढाईत भारताचं हे मोठं यश असल्याचा करण्यात येत आहे. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक आरोप केलाय. देशात 100 कोटी लसीकरण झाल्याचा दावा खोटा असल्याचं राऊतांनी म्हटलंय. देशात केवळ 23 कोटी लसी दिल्या गेल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकंच नाही ते पुराव्यासह सिद्ध करु, असंही राऊत म्हणाले. एकीकडे चीनी सैन्य भारतात घुसखोरी करत आहे. जम्मू-काश्मिरमध्ये हिंदूंचं हत्याकांड सुरु आहे. तर दुसरीकडे देशात लसीचे उत्सव साजरे केले जात आहेत, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केलीय. वाढती महागाई, पेट्रेल-डिझेलचे वाढते दर यावर कुणी बोलत नसल्याचंही राऊत म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे महानायक होते. त्यांनी देशाला क्रांतीची दिशा दाखवली. त्यांनी अनेक क्रांतिकारक निर्माण केले. ब्रिटीशांच्या मनात दहशत निर्माण केली. मदनलाल धिंग्रासारखे लोक निर्माण केले. ते क्रांतिकारकांचे शिरोमणी होते. त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न मागील काही काळापासून होत आहे. हे एकप्रकारे कारस्थान आहे, कपट आहे. ते उधळून लावलं पाहिजे. त्यासाठी माझं पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांना आवाहन आहे. सावरकरांवरील चिखलफेक थांबवायची असेल तर त्यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करा, असं आवाहन राऊत यांनी केलंय.

सेनापतीचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून सुरु झालं आहे. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधींचं जेवढं स्थान आहे. तेवढंच पटेल, सावरकर, भगतसिंग आणि टिळकांचं आहे. त्या सर्वांनी देशासाठी समान त्याग केल्याचंही राऊत म्हणाले. टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण गलिच्छपणे टीका करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केलीय. तत्पूर्वी दैनिक सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरामधूनही शिवसेनेने सावरकरांविषयी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. या लेखात नायकावर चिखलफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं म्हटलं गेलं आहे. “पारतंत्र्यात सावरकर हे सगळय़ांचे नायक होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना खलनायक ठरवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो आजही सुरूच आहे. आजही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही सावरकर या देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सावरकरांविषयी द्वेष आणि विष पसरवूनही ते लोकांच्या मनावर अढळपणे विराजमान आहेत.”