देशात दंगल घडाव्यात म्हणून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची सुपारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलीसांनी दाऊद इब्राहिमच्या गँगमधील तीन जणांना अटक केली आहे. उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातून या तिघांना अटक करण्यात आली आहे.

शिया वक्फ बोर्डाचे वसीम रिझवी यांना जानेवारीमध्ये धमक्यांचे फोन आले होते. फोनवरील व्यक्तीने त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रिझवी यांनी पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. दिल्ली पोलीसांनी रिझवी यांना धमकी दिल्याप्रकरणी दाऊदच्या गँगमधील तीन जणांना अटक केली. या तिघांनी दाऊदच्या सांगण्यावरुन वसीम यांच्या हत्येचा कट रचला होता. वसीम यांची हत्या करुन देशात दंगल पसरवण्याचा त्यांचा कट होता, असे दिल्लीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वसीम रिझवी यांनी राम मंदिर वादावर तोडगा सुचवला होता. अयोध्येत राम मंदिर बांधावे आणि मशीद लखनौत बांधावी, असा तोडगा त्यांनी सुचवला होता. मात्र, त्यांनी दिलेल्या तोडग्यावर मुस्लीम समाजातील काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे रिझवी यांनी १९ मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहून अयोध्येत राम मंदिर बांधण्यास पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले होते. राहुल गांधी यांनी देश प्रेम आणि देवावरील श्रद्धा सिद्ध करावी आणि राम मंदिराच्या बांधकामास पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले होते.