Maharashtra

देशातील ३० टक्के वाहन परवाने बोगस  – नितीन गडकरी

By PCB Author

October 07, 2018

नागपूर, दि. ७ (पीसीबी) – आरटीओ कार्यालयांत भ्रष्टाचार करून वाहनांना कसे परवाने   दिले जातात. त्यासाठी डीलर्स लोक काय काय करता, याची सर्व माहिती मला आहे. हा भ्रष्ट कारभार  रोखण्याचा माझा प्रयत्न आहे. मात्र, भ्रष्ट आरटीओ अधिकारी काही खासदारांकडून लॉबिंग करून तसे होऊ देत नाहीत, असा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

नागपुरात ऑटो डीलर्स संघटनेच्या  (फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल्स डीलर्स एसोसिएशन) कार्यक्रमात गडकरी बोलत होते.  देशातील ३० टक्के वाहन परवाने बोगस  आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

बोगस वाहन परवान्यांमुळे देशभरात दरवर्षी ५ लाख अपघात होतात. यामध्ये जवळपास दीड लाख वाहनचालकांचा मृत्यू होत आहे. आरटीओ कार्यालय आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील भ्रष्ट कारभार थांबविण्यासाठी मोटार वाहन कायद्यात केंद्र सरकारने काही बदल करण्याचा निर्णय घेतला  आहे. याबाबतचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.  येत्या अधिवेशनात ते राज्यसभेत मंजूर होईल, असा विश्वास  गडकरी यांनी व्यक्त केला.