बुलढाणा, दि.२४ (पीसीबी) – मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी वादग्रस्त विधान केले आहे. एमआयएमचे नेते वारीस पठाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून आक्रमक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. वरीस पठाण यांच्या या विधानावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे, पण हे प्रत्युत्तर देताना त्यांचीच जीभ घसरली आहे.
यावेळी बोलताना गायकवाड यांनी वारीस पठाण यांच्याबद्दल ‘देशद्रोही लांड्या’ असे आक्षेपार्ह भाष्य केलं आहे. तसंच ‘आतापर्यंत तुम्ही तुमच्या बायका घरात ठेवल्या. त्या बायकांना गुलाम बनवून ठेवलं. त्यांना कधी बाहेर येऊ दिले नाही. त्यांना सांगितलं गेलं की मिलेट्री येणार, तुम्हाला घरातून बाहेर काढणार, तुम्हाला देशाबाहेर हकलणार, असं खोटं सांगून बाहेर आणलं. आता त्याने सांगितलं १५ कोटी मुसलमान १०० कोटी हिंदूवर भारी पडतील असाच बोलला ना. पण तू विसरलात वारीस पठाण शिवरायांचा मावळा तुझ्या लाखाची फौज असेल तर ५०० मावळे तुझ्या लाखाच्या फौजेला चीत पाडायचे हे तू विसरला आणि आजही शिवरायांची जमात या राज्यात जिवंत आहे,’ असे आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी वारीस पठाण यांना थेट आव्हान दिले आहे. तू १५ कोटीची गोष्ट काय करतो. मी सोमवारी तुला विधानसभेत भेटतो. असेल तिथे दाखव मला १५ कोटीची काय गोष्ट करतो, उभा नाही फाडला तर संजय गायकवाड एका बापाची औलाद नाही. तसेच तुझी जशी जीभ चालते तशी आमची तलवार चालते,’ असे विधान त्यांनी केले आहे. दरम्यान, गायकवाड यांच्या या वादग्रस्त विधानाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्यांच्यावरही चहुबाजूने टीका होताना दिसत आहे.