Maharashtra

देवेंद्रजी, पुन्हा लाट येईल असे वाटत नाही; राज ठाकरेंचे व्यंगचित्रातून टिकास्त्र

By PCB Author

October 09, 2018

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – पुढचा मुख्यमंत्री मीच राहणार, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा हा त्यांचा वैचारिक दुष्काळ असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी ट्विटरवर हे व्यंगचित्र पोस्ट करत सत्ताधारी भाजपाला फटकारले.

रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूरमध्ये होते. विकासकामांसाठी लातूरकरांनी निधीची चिंता करु नये, कारण पुढच्यावेळीही मीच मुख्यमंत्री असेन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या विधानाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यात २०१ तालुक्यात दुष्काळ असून खरिपाबरोबर यंदा रब्बी हंगामही धोक्यात आहे. राज्याची आर्थिक परिस्थितीही बिकट आहे. अशा परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस पुढचा मुख्यमंत्रीही मीच राहणार, असा दावा करतात, असे व्यंगचित्रात दाखवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील जनता देवेंद्रजी, पुन्हा लाट येईल असे वाटत नाही’, असे म्हणत असल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.