मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुंबईकडे जाणारे दूध रोखायले ते शहर काय पाकिस्तानात आहे का?, असा प्रश्न विचारत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच्यावर पलटवार केला आहे. दूध बंद करुन वेठीस का धरता, या मागणीसाठी लोकशाही मार्गानेदेखील आंदोलन करता येऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रुपये अनुदान देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १६ जुलैपासून दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेकडून मुंबईकडे जाणारे दूध प्राधान्याने रोखण्यात येणार आहे. मुंबईला पंधरा लाख लीटर दूध गुजरात, पाच लाख लीटर दूध कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या इतर भागांमधून असे एकूण ७० लाख लीटर दूध दररोज पोहोचवण्यात येते. १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून मुंबईकडे जाणारे दूध रोखण्यात येईल, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. वेळप्रसंगी कायदा देखील हातात घेऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टींवर पलटवार केला. दूध बंद करायला मुंबईकडे काय पाकिस्तानात आहे का?, आंदोलन करायचे असेल तर ते लोकशाही मार्गाने करावे, रस्त्यावर भाजीपाला फेकून किंवा दूध टाकून आंदोलन करणे चुकीचे आहे. यात शेतकऱ्यांचेच नुकसान आहे, असे पाटील यांनी सांगितले. मोर्चा, धरणे आंदोलन, उपोषण हे मी समजू शकतो, पण मालाची नासाडी करणे हे योग्य नाही, असे ते म्हणालेत.