मुंबई, दि. १६ (पीसीबी) – महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (मंगळवार) थंडावणार आहेत. दहा मतदारसंघांमध्ये गुरुवारी (दि.१८) मतदान होणार आहे. तर देशभरातील १३ राज्यांमधील एकूण ९७ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील १० मतदारसंघात मतदान होणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मतदान होणार आहे. या मतदारसंघांतील प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपणार आहे. दरम्यान, युती, आघाडीच्या उमेदवारांनी अंतिम टप्प्यात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी, कोपरा सभा यावर दिला.
दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, भाजपच्या प्रीतम मुंडे, प्रतापराव चिखलीकर, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.